गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670 अतुलनीय शौर्याची ती रात्र
पंढरीचा विठोबा व रायरीचा शिवबा ही इथल्या मातीची श्रद्धा स्थानं आहेत.छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे मानवी देहाचे सर्व गुणधर्म पाळून मानवी देहा आधारे कमाल अकल्पित व अचंबित करणारे कार्य हे होय. सामान्य घरातून पुढे आलेल्या मावळ्यांना शिवरायांचे नेतृत्व लाभले अन् त्यामुळे हे सरदार मावळे अजरामर कीर्तीस पोहचले तसेच यांच्या अनोख्या स्वामीनिष्ठ पराक्रमामुळे शिवराय स्वराज्य निर्माण करू शकले.
अतुलनीय शौर्याची ती रात्र
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
शिवरायांची आठवण येताच नेतोजी पालकर, मोरोपंत पिंगळे, बाजीप्रभू,जीवाजी महाले, मुरारबाजी देशपांडे ,येसाजी कंक,बाजी पासलकर,जेधे,बांदल,गोळे अशी खूप खूप नावे एकाच वेळी आठवतात.काही रणसंग्राम तर असे आहेत की तिथं त्या विशिष्ट सरदाराचा पराक्रम पटकन डोळ्यासमोर येतो.घोडखिंड बाजींच्या नावाने पावनखिंड झाली.नेसरीच्या खिंडीतला वेडात दौडलेल्या सात वीरांचा पराक्रम प्रतापराव गुजरांच्या नावे अमर झाला.पुरंदरची लढाई मुरारबाजीच्या शौर्याने कीर्तीमान झाली.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670 अतुलनीय शौर्याची ती रात्र
स्वराज्याच्या इतिहासात अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांचे बलिदान आहे.आज एका सुभेदार मावळ्याचा स्मृतिदिन आहे.हा असा सुभेदार आहे ज्याच्या नावाशिवाय स्वराज्याच्या इतिहासाची मांडणी पूर्णत्वास जाऊच शकत नाही.ते सुभेदार म्हणजे तानाजी मालुसरे . गड आला पण सिंह गेला ही म्हण ज्यांच्या धारातीर्थींने रूढ झाली ते तानाजी मालुसरे.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
स्वराज्य निर्माणीच्या पायाभरणी पासून ते सिंहगडाच्या लढाईपर्यंत शिवकार्यात तानाजी मालुसरे सहभागी होते.ते शिवबाचे बालसवंगडी होते.
सुरूवातीला तोरणा घेताना जावळी मारताना,अफजलखानाच्या फौजेवर तुटून पडताना,सुर्वेला जरब शिकवताना,कारतलबखानास शिकस्त देताना,शायिस्ताखानास दम देताना तानाजी सोबत होतेच.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
तानाजी मालुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील जावळी जवळील गोडवली या गावात झाला.गावची पाटीलकी तानाजींच्या घरात होती.आदिलशाही फौजैच्या एका हल्ल्यात वडील काळोजी मालुसरेंना वीर मरण आले.यानंतर तानाजीच्या आईने रायगड जिल्ह्यातील उमरठे माहेर गाठले.तानाजींचे मामा कोंडाजी रायाजी शेलार , ज्यांना इतिहास शेलारमामा या नावाने ओळखतो ,यांच्याकडे तानाजी राहू लागले.उंबरठे हे गाव घाट वाटेवर असून कोकण व घाट माथा यांना जोडणारे आहे.त्याकाळी इथं वाटमारी होत असे.चोरांचा,वाटमारीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजीवर सोपविली होती.या जबाबदारीचे सोनं करत तानाजीने वाटमारी करणाऱ्या तरूणाईला स्वराज्य कार्यात ओढले.
रोहिडा,कोंढाणा ,तोरणा ,राजगड सर करत स्वराज्याची घौडदौड वाढतच होती.अमावस्यानंतर पौर्णिमेकडे वाटचाल करणारा चंद्र दिवसेंदिवस आजच्यापेक्षा उद्या थोडा मोठा होत जातो व वाढत्या आकाराला अधिक चकाकीही देतो.स्वराज्यही असंच वाढत होतं.रायरीचे मोरे त्याकाळी एक प्रबळ वतन होते व आदिलशहाच्या खास मर्जीतील होती.जावळी प्रांतचे निरंकुश सत्ताधारी म्हणून मोरे ओळखले जात होते.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
शिवरायांनी जावळीवर आक्रमण करत मोरेंची सत्ता उलथून टाकत जावळी ताब्यात घेतली.या घटनेमुळे शिवरायांचा दबदबा वाढला.चिडलेल्या आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखानाने स्वराज्यावर चाल करून पाठविले.महाराजांनी अकल्पित बुद्धी चातुर्य वापरून अफजलखानासाठी सापळा रचला व खान त्यात बेमालूम फसला. खानाच्या फौजेवर तुटून पडण्यासाठी पाच विशेष ताज्या दमाच्या फौजेच्या तुकड्या केल्या होत्या त्यातली एक तुकडी तर तानाजीच्या नेतृत्वाखाली होती.
तानाजीने विशेष पराक्रम गाजविला.स्वराज्याचे बळ जसे वाढत तसे इकडे तानाजीचा पराक्रमही वाढतच होता.तानाजी आता शिवरायांच्या गळ्यातील ताईत बनला होता.अशातच शायिस्ताखान स्वराज्यावर चालून आला.पुण्यात तळ ठोकलेल्या शायिस्ताखानाने तळकोकणचा ताबा घेण्यासाठी कारतलबखानास पाठविले.या कारतलबखानास शिवरायांनी असे कोंडले की तळकोकण घेण्याऐवजी तोच तळातल्या गाळात रुतला.कारतलबखानास सपशेल शरणागती पत्करायला लावली. नेतोजी पालकरला उंबरखिंड परिसरात मागे ठेवत छत्रपती शिवराय ,येसाजी कंक,तानाजी मालुसरे रातोरात दाभोळ, संगमेश्वर,शृंगारपूरला दाखल झाले.सूर्यराव सुर्वे त्यावेळी शृंगारपूरचा वतनदार होता.हाच तो सूर्यराव सूर्वे ,ज्याने घोडखिंडीतून सुटलेल्या शिवरायांची विशाळगडाच्या पायथ्याला वाट अडवली होती.सूर्यरावांचा समाचार घेण्याची जबाबदारी तानाजीने चोख पार पाडली.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
थोडक्यात काय तर तानाजीची कीर्ती रोजच वाढत होती.पुरंदरच्या तहानंतर महाराजांकडे बोटावर मोजण्याइतकेच किल्ले उरले होते.तहाच्या करारानुसार महाराज औरंगजेबाच्या कराल दाढेत गेले.पण अत्यंतिक शिताफीने सुटका करून घेत महाराजांनी गरूडझेप घेतली.
1666 नंतर महाराजांनी अकल्पित आक्रमक रूप धारण केले.खिळखिळ्या झालेल्या आदिलशाहीकडे कानाडोळा करत त्यांनी संपूर्ण कौशल्य मोगलाई नेस्तनाबूत करण्यासाठी वापरले.याचाच एक भाग म्हणून मोगलाईला प्रचंड चपराक देण्यासाठी शिवरायांनी कोंढाणा जिंकून घेण्याचा मनसुबा मांडला.
एव्हाना आता महाराजांचा शब्द तळहातावर घेणाऱ्या सरदार सुभेदाराची संख्या वाढलेली होती.पण कोंढाणा किल्ला घेण्यासाठी महाराजांना पराक्रमातला चौफेर चिरा हवा होता.कारण कोंढाणा हा किल्ला बलाढ्य होता.शिवाय या किल्ल्याचा मोगल किल्लेदार उदेभान तितकाच कडवा होता.तो स्वतः एक उत्तम तलवार बहाद्दर होता.आणखी महत्त्वाचे म्हणजे उदेभानाने गडावर डागडुजी करत किल्ला मजबूत करून घेतला होता.गडावर खडा पहारा व गस्त होतीच,महत्त्वाचे म्हणजे गडाच्या घेऱ्यातील स्थानिक गावांवरही त्याने कडवा वचक निर्माण केलेला होता.घेऱ्यातील गावांना गावात आलेल्या पाहुण्यांची वर्दी उदेभानाला द्यावी लागत असे.
यापूर्वी महाराजांनी कोंढाणा घेतलेला होता.त्यापूर्वी व त्यानंतरही अनेक राजवटींनी कोंढाण्यावर आपला अंमल बसविलेला होता.याला कोंढाण्यावरील अत्यंतिक प्राचीन कोंढाणेश्वर साक्षीला आहे.पण यावेळची स्थिती न्यारीच होती.शिवराय निसटून गेल्यामुळे मनातून चरफडत असलेल्या औरंगजेबाने सर्वांनाच सावधगिरीची फर्मानं रवाना केलेली होती.राजगडापासून कोंढाणा जवळच असल्यामुळे औरंगजेबाला त्याचे महत्त्व माहीत होते.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
घरात रायबाचे लग्न होते पण स्वराज्य कार्यास अग्रणी ठेवून तानाजीने कोंढाणा मोहीम आखली.तानाजीच्या आतापर्यंतच्या कामगिरीला व शिवरायांच्या खांद्याला खांदा मिळवून सहभागी मोहीमांचा मागोवा घेता कोंढाणा सर करण्यासाठी तानाजीची निवड सर्वार्थाने परिपूर्ण होती.
बलाढय किल्ला स्वराज्यात सामील करण्याची मोहीम तानाजीने उघडली.यातला पहिला भाग म्हणून गडाच्या परिघातील गावांची ज्याला मेटे म्हणतात त्यांची साथ मिळविण्यास सुरूवात केली.घेरेसरनाईक हा कोळी नायक उदेभानावर नाराज होताच.वाघजाई जंगलात लपून छपून जात तानाजीने घेरेसरनाईकला गाठलेच.त्याचे मतपरिवर्तन केले.रात्रीच्यावेळी गडाभोवती चार पाचवेळा फिरून गस्तीचा अंदाज घेतला.खामगावच्या बाजूने येऊन डोणागिरी कड्याच्या बाजूने गड चढून जाण्याचे मक्रूर केले.या बाजूने डोणागिरीची खोल दरी व घनदाट जंगल होते..
अखेर तो दिवस ठरला.4 फेब्रुवारी 1670.किर्र अंधारात प्रवास व उत्तररात्री हमला बोल अशी घटिका असावी म्हणून नवमीची रात्र निवडली .नवमीला चंद्र रात्री दोनच्या आसपास आकाशात येतो.दुपारनंतर तानाजीने भाऊ सूर्याजी, शेलारमामा यांच्यासह पाचशे मावळ्यांना सोबतीला घेतले.जंगलवटेचा सहारा घेत पाचशे मावळे डोणागिरीच्या कड्याखाली उभे राहिले.पाचशे मावळे वर चढून जाण्यास वेळ लागेल म्हणून दोनशे मावळे सूर्याजीसोबत दिले व त्यांना कल्याण दरवाजातून येण्यास सांगितले.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
कोंढाणा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत.पुण्याच्या दिशेला असलेला पुणे दरवाजा व किल्ला परिघातील छोटे गाव असलेल्या कल्याणकडील कल्याण दरवाजा.पायाच्या बोटावर जोर देत,डोंगर कपारीत हाताची बोटे घालत,वरच्या दिशेने शरीर ढकलत दोन मावळे अंधारात कडा चढून गेली.त्यांनी सोडलेल्या शिडी आधारे उरलेली मावळे गड चढून गेली.पण सर्व मावळे वर चढून जाईपर्यंत शत्रूला चाहूल लागली व लगेच लढाईला तोंड फुटले.तिकडे कल्याण दरवाजा आतून उघडण्यासाठी धावलेले चारपाच मावळेही वाटेतच धारातीर्थी पडल्यामुळे सूर्याजीला कल्याण दरवाजा फत्ते करूनच आत यावे लागले.सूर्याजी व त्याच्यासोबतचे दोनशे मावळे येईपर्यंत इकडे लढाई चरम सीमेला पोहचली होती.उदेभान व तानाजी हे दोघेही वयाने चाळीशीच्या आतबाहेरची त्यामुळे समवयस्कच पण दोघेही कडवे तलवार बहाद्दर.तलवार व ढालीचा खणखणाट ऐकून त्या रात्री जंगलातल्या प्राण्यांचीही भीतीने तारांबळ उडाली असेल.घालावर घाव बसत होते.एकदा ढालीचा एकदा तलवारीचा खणखणाट होत होता.अशातच तानाजीची ढाल तुटली.मुळातच अचानक झालेल्या हल्ल्याने उदेभान प्रचंड संतापलेला होता.आता तानाजीची ढाल तुटली होती.उदेभानाला अधिक चेव सुटला व निर्दयीपणे तो वार करू लागला.
रयतेच्या काळजातल्या राजासाठी काळीज हातात घेणारा तानाजी काही साधा गडी नव्हता.तो सुद्धा शिवरायांचा लाडका सुभेदार होता.तानाजीने डावा हात ढाल म्हणून वापरत उदेभानाचे वार झेलत राहिला .त्याचवेळी उजव्या हाताने वार करणे चालूच होते.शेवटी रक्तबंबाळ तानाजीने एक घाव उदेभानाच्या वर्मी घातला.दोघेही नर योद्धे एकमेकांच्या घावाने रक्ताच्या थारोळ्यात पडले.सुभेदार पडल्याचे पाहून धीर खचलेल्या मावळ्यांना सूर्याजीने लढतं ठेवलं व नवा सूर्योदय होण्यापूर्वी कोंढाणा स्वराज्यात सामील केला.
गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670
तानाजीच्या मृत्यूने शिवराय हळहळले.गड आला पण सिंह गेला असं ते दुःखातिरेकाने बोलले.आजही ती लोकारूढ म्हण तानाजीच्या वीर मरणाची साक्ष देते.
सिंहगडावर तानाजीचे स्मारक आहे.गडावर शिवपुत्र राजाराम राजे यांचीही समाधी आहे पण सिंहगड म्हटलं की आधी सुभेदार तानाजीच आठवतात. सुभेदारांचे वंशज बारा मावळ मधील लव्हेरी गावी राहतात तिथे 1997 साली सिंहगडावरील मुर्तीचा साचा वापरून तयार केलेली तानाजीची मुर्ती बसवून स्मारक उभे केले आहे. पुण्यातील एका भागास नरवीर तानाजी वाडी असे नाव आहे.महाड तालुक्यातील उमरठे येथेही तानाजीचे स्मारक आहे.तसेच जिथं जिथं शिवसृष्टी साकारली आहे, तिथं तिथं तानाजी असतातच.
नरवीर शूर सुभेदारास विनम्र अभिवादन.
कचरू चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434
खुपच छान लेख.
नरवीर तानाजी मालुसरे यांचे चरणी नतमस्तक.
🙏🙏🙏🙏
Awesome Historical moments discription sir, great 👍👍👌👌💐💐🙏🙏
सचित्र लेखन.. खूपच छान 👍
Very nice
Thank you sir
Very nice
Thanks dear friend